चिपळूण च्या पत्रकार हल्ला प्रकरणी अद्याप कोणालाही अटक नाही – संतप्त पत्रकार आंदोलनाच्या पवित्र्यात
चार दिवसात आरोपींना अटक झाली नाही तर पत्रकारांचा तीव्र आंदोलनाचा इशारा
चिपळूण – शहरातील गजबजलेल्या चौकात बहादुरशेख नाका येथे दूरदर्शनचे पत्रकार दीपक भागवत यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याने पत्रकारांमध्ये संताप व्यक्त होत असून लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा चिपळूणच्या पत्रकारांनी दिला आहे.
बुधवार दिनांक २५ मार्च रोजी पतसंस्थेच्या विरोधात शहरातील गजबजलेल्या चौकात बहादुरशेख नाका येथे काहीजण उपोषणात बसणार होते .त्याचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकार दीपक भागवत यांना काही गुंडांनी बेदम मारहाण करून मोबाईल सह साहित्याची चोरी केली. हा सर्व प्रकार उपस्थित अनेकांनी मोबाईलवर शूट केला ज्यामध्ये हल्लेखोर गुंड स्पष्टपणे दिसत आहेत. या हल्लेखोरांना अवघ्या महाराष्ट्राने पाहिले मात्र आज पाचवा दिवस उजाडला तरी आरोपींना अटक करण्यात आली नाही त्यामुळे चिपळूणचे पत्रकार संतप्त झाले असून चार दिवसात आरोपींना अटक झाली नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा इशारा येथे झालेल्या बैठकीत पत्रकारांनी दिला आहे. चिपळूण पोलिसांनी महाराष्ट्र पत्रकार वप्रसार माध्यम संस्था (हिंसक कृत्य व मालमत्तेची हानी प्रतिबंध) कायदा 2017 अन्वये ज्यामध्ये गंभीर (cognizable)
आणि अजामीनपात्र (nonbailable) गुन्हा, गुन्हा दाखल केलेला असला तरी जी कारवाई त्वरित करायला पाहिजे ती करण्यास टाळाटाळ होत असल्याची भावना पत्रकारांनी व्यक्त केली.अशा गुन्ह्यात प्राथमिक तपासणी करून आरोपींना तात्काळ ताब्यात घ्यायचे आहे सोशल मीडियाद्वारे घटनेची चित्रफीत संपूर्ण महाराष्ट्र ने पाहिली, ज्यामध्ये हल्लेखोर स्पष्टपणे दिसत आहेत, तरीही पोलीस विलंब करत आहेत. यामुळे येथील पत्रकारांनी रस्त्यावर उतरून लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्याचे ठरवले असून चार दिवसात आरोपींना अटक झाली नाही तर तीव्र
आंदोलन छेडण्याचा इशारा चिपळूणच्या पत्रकारांनी दिला आहे.




