चिपळूण – पत्रकार दीपक भागवत यांच्यावर हल्ला करून त्यांना जबर मारहाण करणाऱ्या हल्लेखोरांवर चिपळूण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दिनांक २५ मार्च २०२६ रोजी दुपारी १२.०० वा. च्या सुमारास बहादूरशेख नाका चिपळूण येथे चिपळूण नागरी पतसंस्थेच्या विरोधात उपोषणकर्ते रुपेश पवार हे उपोषणाला बसत असताना उपोषणाचे वृत्तांकन करण्यासाठी पत्रकार दीपक भागवत हे आपल्या कॅमेरामन रुपेश साळुंखे यांचे सह तेथे गेले होते.१० ते १५ लोकांनी त्यांना “तू कसला पत्रकार , तू कसली शूटिंग करतो?” असे बोलत बेकायदेशीर जमाव करुन हाताच्या थापटांनी व लाथाबुक्क्यांनी मारहाण तसेच शिवीगाळी व दमदाटी केली. शिवाय फिर्यादी यांचे साईड बॅग मधील ओळखपत्र व इतर साहित्याची चोरी केली म्हणून फिर्यादी पत्रकार दीपक दिलीप भागवत राहणार रत्नागिरी यांनी अनोळखी १० ते १५ लोकांचे विरोधात तक्रार दिल्यावरून चिपळूण पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ८२२०२६ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १८९(२), १९०, १९१(२),३०३(२),११५(२),३५२,३५१(२),३५१(३), महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) अधि. २०१७ चे क.४ प्रमाणे दिनांक २५ मार्च २०२६ रोजी १८.३० वाजता गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी चिपळूण श्री.बेले हे करीत आहेत. गुन्हा दाखल होऊनही अद्याप कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही. मारहाण करतानाचे चित्रीकरण अवघ्या महाराष्ट्राने पाहिले ज्यामध्ये हल्लेखोरांचे चेहरे पूर्णपणे दिसून येत आहेत. तरीही अजून कोणालाही ताब्यात घेतले गेलेले नाही. आमचा तपास चालू असून आरोपींना लवकरच ताब्यात घेऊ असे पोलिसांकडून म्हटले जात आहे. या घटनेचा नेमका कर्ता करविता कोण? याचाही तपास झाला पाहिजे अशी येथील पत्रकारांची भूमिका आहे. पोलिसांकडून पारदर्शक रितीने न्याय मिळतो का? याकडे अख्या चिपळूणचे लक्ष लागले आहे.





