महाराष्ट्र

पत्रकार दीपक भागवत हल्ला प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करा : अन्यथा १४ एप्रिल पासून बेमुदत उपोषण

चिपळूणातील पत्रकारांचे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन

चिपळूण : पत्रकार दीपक भागवत यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी संबंधित आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अन्यथा १४ एप्रिल २०२६ पासून चिपळूणमधील पत्रकार बेमुदत उपोषण आंदोलन छेडतील, असा इशारा देत पत्रकारांनी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांना निवेदन सादर केले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, २५ मार्च २०२६ रोजी शहरातील बहादूरशेख नाका येथे भरदिवसा वृत्त संकलनासाठी गेलेल्या पत्रकार दीपक भागवत यांच्यावर काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी नियोजनपूर्वक जीवघेणा हल्ला केला. या घटनेची चित्रफीत उपलब्ध असून हल्लेखोर स्पष्टपणे ओळखू येत असतानाही, घटनेला आठ दिवस उलटूनही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. यामुळे कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे पत्रकारांनी नमूद केले आहे.

पत्रकारांवर होणारे हल्ले हे भारतीय संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट आघात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलीस प्रशासनाकडून अपेक्षित वेगाने तपास व कारवाई होत नसल्यामुळे पत्रकारांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असल्याची खंतही व्यक्त करण्यात आली.

यावेळी पत्रकारांनी मागणी केली की, या प्रकरणाचा जलदगतीने तपास करून गुन्ह्यातील सर्व आरोपींना तातडीने अटक करण्यात यावी. अन्यथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी, १४ एप्रिल रोजी, चिपळूणमधील पत्रकार लोकशाही मार्गाने बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करतील.

हे उपोषण चिपळूण येथील मा. प्रांताधिकारी कार्यालयासमोर करण्यात येणार असल्याचेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

पत्रकारांनी निवेदनात म्हटले आहे की, संविधान रचणाऱ्या महामानवाच्या जयंतीदिनी न्यायासाठी उपोषण करण्याची वेळ पत्रकारांवर येणे हे अत्यंत दुर्दैवी असून, पोलीस प्रशासनाने या निवेदनाची गंभीर दखल घेऊन तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. यावेळी चिपळूणमधील बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!